पुणे : ‘रोजच्या अनेक जबाबदाऱ्यांच्या धावपळीत आपण व्यक्त होत नाही. काही लिहायचे म्हटले, तरी आपण लिहू शकू का, येथपासून ते, जे लिहू त्याला कोणी वाचेल का, वाचले तर काय म्हणेल, अशा शंका काढत आपण लिहीतच नाही; पण लेखन स्वतःला व्यक्त करण्यासाठी करावे, कोणी वाचण्यासाठी नाही, हे ध्यानात ठेवले की लिहिणे सोपे होते,’ असे मत प्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांनी व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून ‘रायटिंग विथ वूमन’ (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू) या कथालेखन कार्यशाळेचे आयोजन मेनन यांनी केले होते. ही कार्यशाळा सात मार्चला बाणेर येथील ‘बिझ बे बाणेर’मधील मंचिंग रूट कॅफे येथे झाली. मेनन यांची ‘फाइस्टी अॅट फिफ्टी’, ‘लेगसी’, ‘देवी, दिवा ऑर शी डेव्हिल’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. या कार्यशाळेत समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील, पार्श्वभूमीच्या महिला सहभागी झाल्या होत्या. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना व्यक्त होण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या कार्यशाळेद्वारे करण्यात आला. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने स्वतःला लिहिते कसे करावे याचे कानमंत्र त्यांनी या वेळी दिले.
त्या म्हणाल्या, ‘महिला कामाला बाहेर पडून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत असल्या, तरी आजही त्यांना व्यक्त व्हायला मिळत नाही. महिलांकडे सांगण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे खूप काही असते. परंतु ते व्यक्त कसे करावे हेच त्यांना माहीत नसते. त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार न करता पेन हातात घ्यावे. जोवर पेन कागदाला लागत नाही, तोवर लेखन सुरू होऊ शकत नाही.’
आपले अनुभव, भावना, आठवणी कथांद्वारे मांडण्याचे एक तंत्र असते. ते तंत्र, त्यातील सहज सोप्या टिप्स या कार्यशाळेत सांगण्यात आल्या. ‘कथेला भाषेचे बंधन नसते, कथा हीच एक भाषा आहे,’ असे मेनन मानतात. त्यामुळे भाषेचे बंधन न बाळगता लेखनावर प्रेम करणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषा माध्यमांच्या महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.
‘लेखन आपल्या आनंदासाठी असते. एकदा लिहायला सुरुवात झाली, की सुचायलाही लागते. सुचत नाही म्हणून लिहीत नाही असे म्हणत लेखन टाळू नये. स्वतःच्याच आयुष्यातील अनुभवांना विषय समजून लिहू लागले तर खूप गोष्टी सापडतील.’ असे त्या म्हणाल्या.
‘जेव्हा एखादी स्त्री लिहिती होते, तेव्हा ती फक्त तिची गोष्ट सांगत नसते, तर त्या वेळचा समाज, समाजजीवन, आवडत्या-नावडत्या गोष्टी, त्यातून उलगडणारी पार्श्वभूमी, सामाजिक प्रगती आणि बरेच काही उलगडत जाते. एका बाईच्या लेखनातून तिच्या भोवतालची परिस्थिती समजू शकते,’ असे मेनन यांनी सांगितले.
‘लेखन पंचेंद्रियांनी अनुभवता यायला हवे, लेखनातून वाचकाच्या डोळ्यासमोर एक चित्र रेखाटले जावे,’ असा कानमंत्रही त्यांनी या वेळी दिला.